प्रशांत ठेपाले
लाेकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : वन विभागाची शान म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील साॅ मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून ही साॅ मिल ताेट्याचा सामना करीत आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने खरेदी केल्यानंतर या मिलचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आलापल्ली भागातील सागवानाचा उच्च दर्जा लक्षात घेऊन सागाची कटाई करण्यासाठी जवळपास १२० वर्षांपूर्वी इंग्रजांनी आलापल्ली येथे साॅ मिल सुरू केली. राज्यात शासनाच्या मालकीच्या केवळ तीन साॅ मिल आहेत. त्यामध्ये डहाणू, पांढरकवडा व आलापल्ली येथील साॅ मिलचा समावेश आहे. साॅ मिलमधील कर्मचारी वेळेवर हजर न राहणे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार न पाडणे, लाकूड कापण्यासाठी आलेल्या ग्राहकाला उद्धट वागणूक देणे, तसेच हवी तशी सफाईदार लाकूड कटिंग करून न देणे, यामुळे बहुतांश नागरिक व ठेकेदारांनी आलापल्ली येथील साॅ मिलमधून लाकूड कटाई बंद केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून लाकूड कटाई करून आणतात.
सागवान लाकडाच्या खांबांवर टिनाचे पत्रे टाकून साॅ मिल तयार करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून ही मिल ताेट्यात आहे. आणखी ताेटा सहन करणे वन विभागाला व शासनालाही परवडणारे नाही. त्यामुळे ही मिल वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एन. वासुदेवन यांनी काही दिवसांपूर्वी साॅ मिलला भेट देऊन पाहणी केली. हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याने मागील आठ दिवसांपासून येथील कामकाज पूर्ण ठप्प पडले आहे. विशेष म्हणजे, वनविकास महामंडळ हा सुद्धा शासनाच्या विभागापैकी एक विभाग आहे. जे काम वनविभागाला जमले नाही, ते काम वनविकास महामंडळ करून साॅ मिलला नफ्यात आणणार काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या साॅ मिलमध्ये चाैकीदार, कटर, सायर असे जवळपास १५ कर्मचारी आहेत. त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाणार आहे.