राजीव गांधी सभागृहात घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृह परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
खासगी वाहतुकीकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष
एटापल्ली : खासगी वाहने बसच्या पाच मिनिटांपूर्वी सोडली जातात. त्यामुळे संपूर्ण प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यांच्या मागे बस जात असल्याने बसला प्रवासी मिळत नाही. परिणामी बसला तोट्याचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये अद्यापही महामंडळाची बससेवा पोहोचली नाही.
नळ पाणी पुरवठ्यासाठी टिल्लू पंपाचा वापर सुरूच
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र गडचिरोली शहरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरामधील नळातील पाणी प्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
शासकीय कार्यालये अस्वच्छतेच्या गर्तेत
गडचिरोली : शहरातील अनेक कार्यालयाच्या इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे़ मागच्या बाजुने कच्चा रस्ता असून त्यावर घाण, कचरा साठून असतो़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़ विशेष करून शासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र दिसून येते.
लखमापूर बोरी बाजारात ओट्यांची निर्मिती करा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी हे परिसरातील मोठे गाव असून येथे दर शुक्रवारला आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यासह ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे ओटे बांधावेत.
कमाल जमीन धारणेची अट रद्द करा
अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकºयांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. अनेक शेतकºयांकडे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र सदर जमीन सिंचनाअभावी पडीक आहे.
सुगंधित तंबाखूची तस्करी वाढली
गडचिरोली : संपूर्ण राज्यात सुगंधीत तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्यासोबत जोडली आहे. त्यामुळे काही तस्कर छत्तीसगड राज्यातून तंबाखूची तस्करी करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री केली जात आहे. यासाठी मात्र दामदुप्पट किमत आकारली जात आहे.
निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.