आरमोरी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगणमताने मर्जीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार मतदान झोन देण्यात आले. निवडणूक प्रशिक्षणानंतर ऐनवेळी अनेक कर्मचाऱ्यांचे नाव रद्द करण्यात आले. ५५ वर्षावरील निवडणूक कर्मचाऱ्यांना अतिसंवेदनशील भागात पाठविण्यात आले. या साऱ्या प्रकारात चिरीमिरीचा आरोप अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. एकीकडे ५५ वर्षावरील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार पेटीशिवाय अतिसंवेदनशील भागात पाठविण्यात आले. तर दुसरीकडे आपसी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार मतदान केंद्र देण्यात आले. ग्रा.पं. निवडणुकीसाठी ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यापैकी मर्जीतील कर्मचाऱ्यांची नावे ऐनवेळी वगळण्यात आली, असा आरोप अन्यायग्रस्त निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे. ऐनवेळी नावे वगळण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा प्रमाणपत्राची चौकशी करावी, निवडणुकीच्या कर्तव्यावर जाण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकश्ी करून त्यांच्यावर झालेला खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मर्जीतील कर्मचाऱ्यांसाठी मतदान केंद्र बदलविले
By admin | Updated: May 4, 2015 01:34 IST