प्रेमप्रकरणातून बदडले : आसरअल्लीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणीसिरोंचा : तालुक्यातील रंगधामपेठा येथील निर्मला व्यंकटस्वामी मोगरम या महिलेच्या मुलाने प्रेमप्रकरणातून मुलीलाला पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलांची आई निर्मला मोगरम हिला पोलीस ठाण्यात बोलावून तब्बल ५ दिवस ठाण्यात बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिला निर्मला मोगरम यांनी केली आहे.या घटनेसंदर्भात मारहाण प्रकरणास कारणीभूत असलेल्या आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी पीडित महिला निर्मला मोगरम यांनी केली आहे. निर्मला मोगरम यांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा मुलगा महेंद्र लक्कस्वामी मोगरम (२४) रा. रंगधामपेठा याचे त्याच्याच गावातील व त्यांच्याच समाजातील १९ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाची माहिती दोनही कुटुंबांना झाली होती. मात्र मुलीच्या वडीलाला हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते. मुलीच्या कुटुंबांकडून प्रेमसंबंधाला होत असलेला विरोध पाहून या प्रेमयुगुलांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यानुसार दोघेही ३० जून रोजी सोमवारला गावातून पळून गेले. याबाबत मुलीच्या वडीलांनी १ जुलै रोजी मुलगी पळवून नेल्याची तक्रार आसरअल्ली पोलीस ठाण्यात दिली. २ जुलै रोजी बुधवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान तीन दुचाकीवर पाच पोलीस जवान व एक महिला पोलीस कान्स्टेबल माझ्या घरी आले व त्यांनी आपल्याला दुचाकीवरून बसवून पोलीस ठाण्यात नेले, अशी माहिती मुलाची आई निर्मला मोगरम यांनी दिली. यावेळी कोणतीही विचारपूस न करता उपस्थित असलेले ठाणेदार कोळी व इतर चार महिला पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केली, असा आरोप निर्मला मोगरम यांनी केला आहे. या मारहाणीत आपल्या दोन्ही तळहातावर फोड आले. तसेच पाठीवर व्रण उमटले. आपली कोणतीही चूक नसताना आपल्याला पोलिसांनी नाहक बेदम मारहाण केली, असे सांगितले. या संदर्भात आसरअल्ली ठाण्याचे पोलीस निरिक्षक व्ही. बी. कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निर्मला मोगरम या महिलेला कुठल्याही प्रकारची मारहाण केली नाही. तिच्या मुलाने मुलगी पळवून नेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीसाठी तिला दोन ते तीन दिवस ठाण्यात ठेवले होते. चौकशीसाठी सदर महिला सहकार्य करीत नव्हती, असेही ठाणेदार कोळी यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांकडून महिलेला बेदम मारहाण
By admin | Updated: July 14, 2014 23:58 IST