शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीचे विद्यार्थी वैरागड : कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकड्यांची विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली होती. या विरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर पटसंख्या ‘जैसे थे’ च ठेवून आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. सन २०१३- १४ या शैक्षणिक वर्षात शासनाने माध्यमिक शाळांना संलग्न असलेल्या आदिवासी विभागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ५०, ग्रामीण भागासाठी ५५ व शहरी भागातील उच्च माध्यमिक शाळेच्या तुकडीची विद्यार्थी पटसंख्या ६० ठरविण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात मात्र या तिनही विभागातील पटसंख्येची अट वाढवून ८० एवढी करण्यात आली. वरीष्ठ महाविद्यालयाला संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीची संख्या ८० वरून १२० करण्यात आली. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आले होते.या विरोधात २२ जुलै रोजी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चे काढण्यात आले. या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, २८ जुलै रोजी शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन संच मान्यता रद्द करण्यात येईल. उर्वरित मागण्यांवरसुद्धा सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)
पटसंख्या ‘जैसे थे’ राहणार
By admin | Updated: July 25, 2015 01:59 IST