लाेकमत न्यूज नेटवर्ककमलापूर/एटापल्ली : अनेक वर्षांपासून नक्षली दहशतीत वावरणाऱ्या कमलापूर परिसरात यावर्षी नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जनजीवनावर फारसा प्रभाव नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर्षी नक्षल सप्ताह शांततेत पार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एटापल्ली तालुक्यातही पोलिसांनी गस्त वाढवत नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव, कोरची आणि भामरागड तालुक्यात छत्तीसगडकडील गावांमध्ये काही प्रमाणात नक्षली प्रभाव दिसून आला. त्यामुळे खासगी वाहने, कार्यालये सुरू असली तरी सरकारी कामकाजावर परिणाम दिसून आला नाही. कमलापूर भागात अनेक वेळा जाळपोळ, हत्येसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नक्षल सप्ताह म्हटले की अनेकांच्या मनात धडकी भरते. सप्ताहापूर्वी बॅनर, पत्रके टाकली जातात. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली जातात. दुर्गम भागातील वाहने देखील बंद असतात. तो बंद हाणून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र अलिकडे पोलीस नक्षलवाद्यांवर वरचढ ठरले आहेत. यावर्षी कमलापूर भागात एकही पत्रक किंवा बॅनर आढळून आले नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अनेक दुर्गम भागात पक्के रस्ते निर्माण झाले आहेत. त्यामुळे यावर्षी दुचाकीने अनेक लोक कमलापूर येथे व्यापार व शासकीय कार्यालयातील कामासाठी पोहोचले. शिवाय कमलापूर येथील बाजारपेठ सुरळीत चालू आहे. एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जवानांसोबत पाण्यातून आणि जंगलाच्या वाटेने अनेक किलोमीटर पायी फिरून नक्षलविरोधी अभियानात सहभाग घेतला.