वैरागड : धान साठविण्यासाठी गाेदामात जागा उपलब्ध नसल्याने मार्केटिंग फेडरेशनमार्फत चालविण्यात येणारे वैरागड येथील धान खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नाेंदणी झालेल्या ६१५ शेतकऱ्यांपैकी केवळ १३५ शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहेत.
वैरागड येथील धान खरेदी केंद्रावर ठाणेगा, वासाळा, वनखी येथील शेतकऱ्यांचे धान्य खरेदी केले जात आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे पाच दिवस महाराष्ट्र राईस मिलच्या गाेदामात धान्य साठविण्यात आले, तर काही धान्य कृषी विभागाच्या गाेदामात साठविण्यात आले. दाेन्ही गाेदाम आता पूर्णपणे भरली आहेत. उघड्यावर धान्य ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून धान खरेदीच बंद केली आहे. ज्या शेतकऱ्यांची नाेंदणी हाेऊन टाेकन उपलब्ध झाले आहे, असे शेतकरी केंद्रावर जाऊन आपला नंबर कधी येणार, याबाबत विचारणा करीत आहेत. विशेष म्हणजे एकूण ६१५ शेतकऱ्यांची नाेंदणी झाली आहे. त्यापैकी १३५ शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात आले, तर ४८० शेतकरी अजूनही धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. वैरागड ग्रामपंचायतीजवळ सेवा सहकारी संस्थेचे गाेदाम आहे. या गाेदामात धान्य ठेवावे, असा सल्ला शेतकऱ्यांकडून दिला जात आहे. मात्र, या गाेदामात ओलावा येत असल्याने भिंतीच्या बाजूला असणारे पाेते खराब हाेण्याची शक्यता आहे, असे ग्रेडरकडून सांगितले जात आहे. पुढचे एक ते दाेन महिने उन्हाळ्याचे आहेत. या कालावधीत काही प्रमाणात धानाची भरडाई हाेऊन पावसाळ्यापूर्वी धानाची उचल हाेऊ शकते व धान खराब हाेणार नाही, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स....
आंदाेलनाचा इशारा
अनेक शेतकऱ्यांनी फेडरेशनला धान विक्री करण्याच्या उद्देशाने धान पाेत्यांमध्येच घरी ठेवले आहेत. उंदीर, घुशींमुळे धान कमी हाेत चालले आहे. मागील १५ दिवसांपासून धान खरेदी बंद आहे. आणखी किती दिवस खरेदी बंद राहणार, हे सांगता येत नाही. ३१ मार्चपर्यंतच शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते. या कालावधीपर्यंत नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा क्रमांक आला नाही तर त्यांना धानसुद्धा विकता येणार आहे. अनेक शेतकरी पीक कर्ज काढून धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी कर्ज भरायचे आहे. फेडरेशन धान खरेदी करेल, या आशेने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री केली नाही. मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी न झाल्यास हे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.