शेतकरी हवालदिल : कीटकनाशकांची करण्यात येत आहे फवारणीआरमोरी : मागील २५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर तापत असलेल्या उन्हामुळे दमट वातावरण निर्माण होऊन धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.मान्सूनच्या पहिल्या पावसातच बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातील शेतकऱ्यांनीही धानपिकाचे पऱ्हे टाकले. या भागातील पेरणीचे काम जवळपास १०० टक्के आटोपले आहे. सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने कायमची दडी मारली. २५ दिवसांचा कालावधी उलटला तरी पाऊस पडला नाही. दमट वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव धानपिकांच्या पऱ्यांवर दिसून येत आहे. पाने खाणारी हिरवी अळी पडली आहे. सदर अळीमुळे पऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरीवर्ग विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पाऊस नसल्याने दूबार पेरणीचे संकट कोसळले असताना कीटकनाशकांचा खर्चही शेतकऱ्यांना उचलावा लागत आहे. काही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने सदर शेतकरी उसणेवारी करून कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत. कृषी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश कृषी सहायकांना द्यावे, त्याचबरोबर अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आरमोरी परिसरातील काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: July 13, 2015 01:54 IST