सडण्याच्या मार्गावर : गोदाम नसल्याचा परिणाम; शेतकऱ्यांना सोयीसुविधांचा अभाव भामरागड : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरीअंतर्गत भामरागड केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फतीने धान खरेदी करण्यात आले. यापैकी काही धान गोदामामध्ये साठविण्यात आले आहे. तर काही धान मात्र उघड्यावरच ताडपत्री झाकून ठेवले आहे. पावसामुळे सदर धान ओले होऊन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०१४-१५ या हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यात आली नाही. सुमारे १ हजार ४७१ क्विंटल धान आजही बेवारस अवस्थेत भिजत आहे. गोदामामधील धान्य सुद्धा सुरक्षित नाही. गोदामावरील टिनाला छिद्र पडले आहेत. या छिद्रांमधून पाणी गळत आहे. उघड्यावर असलेले धान्य ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे धान सडून सडलेल्या धानाची दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या धानाची नुकसानभरपाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामंडळाकडे धान खरेदीसाठी व रिकामे पोते खरेदीसाठीसुद्धा वेळप्रसंगी पैसे राहत नाही. २०११-१२ व २०१२-१३ मध्येसुद्धा धान भिजून शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. याचा फटका आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेलासुद्धा बसला होता. खरेदी केलेले धान साठवणूक ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ताडपत्री झाकून ठेवावा लागत आहे. दरवर्षीच शासनाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. दुर्गम भागातील शेकडो शेतकरी बैलबंड्यांच्या सहाय्याने धान आणतात. कधीकधी त्यांना मुक्कामही करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर राहण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बैलांसाठी स्वतंत्र शेडही बांधणे गरजेचे आहे. मात्र या सोयीसुविधासुद्धा निधी नसल्याचे कारण पुढे करून निर्माण केल्या जात नाही. दुसरीकडे लाखोंचे धान सडल्याने नुकसान सहन करावे लागते.
लाखो रूपयांचे धान ताडपत्रीने झाकून
By admin | Updated: August 19, 2016 00:56 IST