आचारसंहितेचा फटका : गृहपालाच्या एका पदाची नियुक्ती रखडलीगडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने वसतिगृह विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत पोटेगाव मार्गावर २ नवीन वसतिगृहांच्या प्रशस्त इमारती उभारण्यात आल्या. आता या ठिकाणी जुने व नवीन मिळून चार वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. सद्यस्थितीत एकच गृहपाल या चारही वसतिगृहाचा कारभार सांभाळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत एका गृहपालाची नियुक्ती रखडली असल्याची माहिती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाने राज्यभरात अनेक शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून नवोपक्रम हाती घेतले आहे. मात्र अनेक शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे त्या प्रमाणात उंचावत नसल्याचे वास्तवही पुढे आले आहे. आदिवासी विद्यार्थी व नागरिकांच्या उत्थानासाठी राज्य शासनाकडून आदिवासी विकास विभागाला दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र आदिवासी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने दुर्गम भागातील आदिवासी अद्यापही विकासापासून वंचित असल्याचे दिसून येते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत पोटेगाव मार्गावरील मुलांच्या क्रमांक १ व क्रमांक २ च्या वसतिगृहात ७५ प्रमाणे १५० विद्यार्थी निवासी राहत होते. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी दोन नवीन वसतिगृहाच्या इमारती याच ठिकाणी उभारण्यात आल्या. दोन नव्या वसतिगृहात १०० प्रमाणे एकूण २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सद्यस्थितीत चारही वसतिगृहाची मिळून एकूण ३५० विद्यार्थी निवासी राहून शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षण घेत आहेत. चार वसतिगृह असले तरी दोनच वसतिगृहाचे कर्मचारी कार्यरत आहेत. विस्तारीत वसतिगृहांमध्ये आदिवासी विकास विभागाच्यावतीने नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. नियुक्ती संदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारचे नियोजन तुर्तास नसल्याची माहिती मिळाली आहे.सप्टेंबर २०१३ पासून नवे दोन वसतिगृह सुरू करण्यात आले. प्रवेश प्रक्रिया राबवून या नव्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र वाढीव वसतिगृहांसाठी वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वसतिगृहात कार्यरत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चार वसतिगृहांसाठी एकच गृहपाल
By admin | Updated: September 24, 2014 23:29 IST