शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:27 IST

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेस ही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, ...

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेस ही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

शासकीय दूध शीतकरण केंद्राचा अभाव

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तालुक्यातील घाटी, गांगुली, मालदुगी परिसरातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्तादेखील नाही.

कव्हरेजअभावी माेबाइलधारक त्रस्त

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाइनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.

शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा

अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.

रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी शहर

आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा

चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत.

ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवा

आरमाेरी : आजचे युग हे ‘डिजिटल युग’ आहे. सर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ग्रामीण भागात प्रशिक्षण संस्था नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायतस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.

धूर फवारणी करण्याची मागणी

गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू

धानोरा : तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव

धानोरा : वीजपुेरवठा खंडित झाल्यास तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर ग्राहक संपर्क साधू शकत नाहीत. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

आष्टी : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.

देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या

आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.

विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर

कमलापूर : कोणतेही वाहनखरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ

आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र संपलेला सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगच्या ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा

आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.

दिना धरणाचे खोलीकरण करा

चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.

मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी खड्डा खोदतात. नंतर हा खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

अनेक गावांना विजेची प्रतीक्षा

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरचीतील रस्ते झाले आहेत खड्डेमय

कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगविले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.