गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यात संघटन मजबूत झाले पाहिजे, यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीचे काम जोमात करावे, असे आवाहन पक्षाचे गडचिरोली जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र वैद्य यांनी केले.येथील कॉम्प्लेक्स परिसरातील विश्रामगृहात आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक माजी राज्यमंत्री तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या सुरूवातीला गडचिरोलीचे माजी पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना मौन श्रध्दांजली वाहण्यात आली. सन २०१५ ते २०१७ या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात प्राथमिक व क्रीयाशिल सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. या नोंदणीनंतर येत्या सात-आठ दिवसात नवे तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्याची नवी कार्यकारीणी गठीत करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र वैद्य यांनी बैठकीत दिली. बैठकीला राकाँचे प्रदेश सदस्य सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, सरचिटणीस शाम धाईत, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, बाबा हाशमी, युवा नेते ऋतूराज हलगेकर, धानोराचे तालुकाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री, जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, रविंद्र वासेकर, अरूण हरडे, विवेक बाबनवाडे, मंदीप गोरडवार, लिलाधर भरडकर, संदीप ठाकूर, ज्योती सोनकुसरे, अजय कुंभारे, इरफान खान, विजय धकाते आदी उपस्थित होते. जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका शांततेच्या वातावरणात बिनविरोध पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्य यांनी केले.
राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकीचे वाजले पडघम
By admin | Updated: March 11, 2015 00:02 IST