कुलभट्टी-बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा
धानाेरा : कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात किमीचे अंतर असून या मार्गावर गिट्टी पूर्णत: उखडली आहे. सदर मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. सदर मार्गावर दोन नाले असून त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चार महिने या मार्गावरील वाहतूक बंद असते.
ऑनलाईन सुविधेपासून ग्रामपंचायती वंचित
भामरागड : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाईन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र अजूनही भामरागड, सिरोंचा तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाईन झाल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून वंचित आहेत.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
नळाला तोट्या नसल्यास कारवाई करा
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डातील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. तोटी नसल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार
जोगिसाखरा : गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना केरोसीन मिळण्याऐवजी ट्रकमालकांना केरोसीन दिले जात आहे. गरिबांना केरोसीन वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
खोब्रागडी नदीपुलावर कठड्यांचा अभाव
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर १० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी या पुलावर लोखंडी संरक्षण कठडे लावण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच हे संरक्षण कठडे यंत्रणेने काढले. तेव्हापासून या पुलावर संरक्षण कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
वीज उपकेंद्रांची संख्या वाढवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या विस्ताराच्या तुलनेत वीज उपकेंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा बिघाड निर्माण झाल्यास वीजपुरवठा सुरळीत होण्यास बराच कालावधी लागतो. लोकसंख्या विरळ असल्याने वीज ग्राहकांची संख्याही कमी आहे. मात्र एका विशिष्ट अंतरावर वीज केंद्राची निर्मिती करणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वीज लाईन जंगलातून गेली आहे. खांबावर झाड पडून वीजपुरवठा खंडित होतो. वीज वितरण कंपनीने नियोजन करावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन कामात इंटरनेटचा खोळंबा
गडचिरोली : धानोरा मार्गावर असलेल्या चातगाव येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसापासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे खोळंबली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चातगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी अनेक विभागाचे शासकीय कार्यालये आहेत. स्टेट बँक, वनविभाग, तलाठी, शाळा, महाविद्यालय आदी कार्यालये आहेत. सध्या सर्व कामे ऑनलाईन केली जात आहेत.
जिमलगट्टात मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. याचा नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेणात पाय पडून अनेकवेळा कपडे खराब होत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
कचराकुंड्यांची संख्या वाढवा
एटापल्ली : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून नगरपालिकेचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे़ शहरातील अंतर्गत भागात नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत़ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेबाबत योग्य नियोजन करण्यात न आल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
लखमापूर बोरी परिसरातील सौरदिवे दुर्लक्षित
लखमापूर बोरी : वीजपुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु सध्या या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौर प्लेट लंपास करण्यात आले. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयाचा खर्च पाण्यात गेला आहे.
पांढरे पट्टेविरहित दिसतात गतिरोधक
धानोरा : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावे, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र बहुतांश गतिरोधकांवर पट्टे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. पावसामुळे सदर पट्टे पुन्हा निघून जाणार आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.