मुलचेरात शेतकऱ्यांची बैठक : प्रकल्प रखडल्याने शेतकरी सिंचनापासून वंचितमुलचेरा : तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्प अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने सदर प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रसंगी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी मुलचेरा येथे आयोजित बैठकीमध्ये केला. वीर बाबुराव शेडमाके सभागृहात घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी दादाजी सिडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून मधुसुदन गाईन, शैंलेंद्र खराती, विठ्ठल निखुले, हलदार, प्रकाश दत्ता, बादलशहा, सुभाष आत्राम, गणेश बंकावार, सरपंच हरिपद पांडे, सरपंच मारोती पल्लो उपस्थित होते. मुलचेरा तालुक्यातील चिन्ना सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागातर्फे १३ मे १९७७ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. १९७८ पासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. १९८० पर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले होते. यामुळे सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळेल, अशी आशा बळावली होती. मात्र १९८० मध्ये वन संवर्धन कायदा लागू झाल्याने चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. तेव्हापासून सिंचन प्रकल्पाचे काम बंदच आहे. चेन्ना सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ३७७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या कामाचे सुरूवातीचे अंदाजपत्रक १ कोटी ८० लाख रूपयांचे होते. २०१४ पर्यंत प्रकल्पाची किंमत ८० कोटी रूपयांवर पोहोचली. या सिंचन प्रकल्पाचा फायदा तालुक्यातील १० ग्राम पंचायतींना होणार आहे. यामध्ये आठ ग्राम पंचायती आदिवासी व दोन ग्राम पंचायती बंगाली, अल्पसंख्यांक पुनर्वसित आहेत. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ वनहक्क कायदा २००८ अंतर्गत या प्रकल्पात ८० टक्के ओलीताखालील शेतीला फायदा होणार आहे. २०१४ मध्ये केंद्र सरकारकडून ८ हजार ६४० हेक्टर वनजमीन वनकायद्याच्या कचाट्यातून मुक्त करण्यात आली आहे. परंतु काम मार्गी लागले नाही.सभेला मुलचेरा तालुक्यातील गोमणी, गोविंदपूर, सुंदरनगर, मुलचेरा, बोलेपल्ली व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
चेन्ना प्रकल्पासाठी आंदोलन करणार
By admin | Updated: July 23, 2015 01:19 IST