प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच
देसाईगंज : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या कुठेही टाकल्या जात असल्याने पर्यावरणाला धोका आहे. स्थानिक नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मागील वर्षी प्लास्टिकचा वापर करणाऱ्याविरोधात कारवाई करणे सुरू केले होते. मात्र, आता ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे.
परवाना शिबिराची गरज
आरमाेरी : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे.
शिंगाळा उत्पादनासाठी हवे अर्थसहाय्य
कुरखेडा : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात; परंतु, या व्यवसायाकरिता पैशांच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी हाेत आहे.
जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची मागणी
भामरागड : लाॅकडाऊनपासून अद्यापही शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शाळा नियमित सुरू करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक त्रस्त
गडचिराेली : येथील इंदिरा गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जात आहेत. तसेच या रोडचे नव्याने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहने तसेच पथस्थांना मार्गक्रमण करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्या, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.