आलापल्ली : काेराेना संसर्ग आटाेक्यात आल्यानंतर सध्या राज्याच्या पाच जिल्ह्यांसह काही भागांत बर्ड फ्लूच्या आजाराने भीती निर्माण झाली आहे. अहेरी तालुक्याच्या आलापल्ली येथे अनेक घरांतील काेंबड्या आजाराने मृत्युमुखी पडत असल्याने बेंदवे रिकामे हाेत आहेत. दरम्यान, नागरिकांमध्ये बर्ड फ्लूची थाेडीशी दहशत दिसून येत आहे.
मागील १० ते १५ दिवसांपासून आमच्या घरी तसेच गावातील अन्य शेजारी लोकांनी पाळलेल्या काेंबड्या दिवसभर स्वस्थ राहतात. मात्र, सायंकाळी बेंदव्यात काेंबड्यांना ठेवले जाते. सकाळी पाहिल्यावर त्यातील काही काेंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून येते, असे आलापल्ली येथील एका नागरिकाने सांगितले.
बर्ड फ्लूचा विषय सुरू झाल्यापासून आलापल्ली परिसरातील नागरिक आपल्या पशुधनाबाबत चिंताग्रस्त दिसून येत आहेत. तसेच काही लाेकांच्या मालकीच्या शेळ्या मृत्युमुखी पडत आहेत. असे असतानासुद्धा आलापल्ली परिसरात प्रशासन पाेहाेचले नाही. या भागात बर्ड फ्लूबाबत जनजागृतीही दिसून येत नाही.
याची गंभीर दखल घेऊन पशुधन विभागाने तत्काळ रोगप्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील पशुपालक करीत आहेत.