चार वर्षांत : १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सेवागडचिरोली : गंभीर स्थितीतील रूग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रूग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रूग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या रूग्णवाहिकेने मागील चार वर्षात सुमारे १० हजार ६१० रूग्णांना रूग्णालयात पोहोचवून त्यांना जीवनदान मिळवून दिले आहे. वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रूग्णाला उपचार मिळाल्यास सदर रूग्ण बचावण्याची शक्यता राहते. त्यामुळे या कालावधीला वैद्यकीय क्षेत्रात ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. मात्र रूग्णाला वेळेवर रूग्णालयात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे कठीण असते. त्याचबरोबर गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी वेळेवर रूग्णालयात दाखल करणे, अत्यंत गरजेचे आहे. या अडचणीच्या परिस्थितीत रूग्णाला रूग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने १०८ ही रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा ग्रामीण रूग्णालय, कुरखेडा उपजिल्हा रूग्णालय, अहेरी उपजिल्हा रूग्णालय, सिरोंचा ग्रामीण रूग्णालय, कोरची ग्रामीण रूग्णालय, भामरागड ग्रामीण रूग्णालय, एटापल्ली ग्रामीण रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात दोन अशा एकूण आठ रूग्णवाहिका सात ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यापासून ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुमारे १० हजार ६०० रूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहेत. एकट्या आॅक्टोबर महिन्यात ६५० रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. शासनाच्या या योजनेमुळे अनेक नागरिकांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन गावांमधील अंतर अधिक आहे. त्याचबरोबर लोकसंख्या विरळ आहे. दुचाकी वाहनांची संख्या कमी आहे. अशातच रूग्णाला वेळेवर चारचाकी वाहन उपलब्ध होणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे १०८ क्रमांकाची सेवा नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. विशेष म्हणजे, या रूग्णवाहिकेत एक डॉक्टर उपलब्ध राहतो. त्यामुळे रूग्णाला रूग्णालयात दाखल करतेवेळी जरी काही समस्या निर्माण झाल्यास त्याला डॉक्टरांकडून वेळीच उपचार मिळतात. त्याचबरोबर या रूग्णवाहिकेत अत्यावश्यक सोयीसुविधाही उपलब्ध होत असल्याने याचा लाभ रूग्णाला होण्यास फार मोठी मदत होते. (नगर प्रतिनिधी)रूग्णालयात प्रसुतीचे प्रमाण वाढले गडचिरोली जिल्ह्याती दुर्गम भागात वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. गर्भवती महिलेला रूग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर चारचाकी वाहन उपलब्ध होत नाही. मात्र १०८ क्रमांक डायल केल्यानंतर रूग्णवाहिका संबंधित गरोदर मातेच्या अंगणात काही वेळातच उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांच्या रूग्णालयातील प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. याचा सकारात्म परिणाम दिसून येत असून मागील काही वर्षात बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. ग्रामीण भागात जनजागृतीची गरज१०८ क्रमांकाची रूग्णवाहिका गंभीर स्वरूपातील रूग्णांसाठी देवदूत जरी ठरली असली तरी ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांना याबद्दलची माहिती नाही. त्यामुळे ते गंभीर स्वरूपातील रूग्ण जरी असला तरी रूग्णवाहिका न बोलविता खासगी वाहन शोधण्यात वेळ घालवितात. त्यामुळे १०८ क्रमांकाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक तलाठी यांना माहिती असावी. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला याबाबतचे ज्ञान असण्याच्या दृष्टीने व्यापक जनजागृतीची गरज आहे.
१० हजार ६१० रूग्णांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 01:19 IST