तपासणीत झाले उघड : वृक्ष संगोपनात ग्रामपंचायती फेलदिलीप दहेलकर - गडचिरोलीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात सन २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी हरित सेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेले निम्म्यापेक्षाही कमी वृक्ष जीवंत असल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी तपासणीच्या प्राथमिक अहवालावरून लागवड केलेल्या वृक्षाचे योग्य संगोपन करण्यात साऱ्याच ग्रामपंचायती अपयशी ठरल्या असल्याचे दिसून येते.राज्यशासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत गावपरिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड करण्यात येते. सदर वृक्षलागवडीचा कार्यक्रम दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची तपासणी यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. मात्र यंत्रणेने तयार केलेल्या तपासणी अहवालात पूर्णत: तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे शासनाने निरपेक्ष विशेष वृक्षलागवड तपासणीची मोहीम हाती घेतली. या संदर्भात शासन निर्णय काढून हरित संरक्षक गटांमार्फत ग्रा. पं. च्या वृक्षलागवडीच्या तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या तपासणीकरिता हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. याबाबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी एक विशेष बैठक बोलावून वृक्षलागवड तपासणीच्या कार्यक्रमाचे नियोजन निश्चित करण्यात आले होते. या कार्यक्रमानुसार २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत शाळातील हरित सेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत विशेष तपासणी करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी वृक्षलागवड कार्यक्रमाची तपासणी करून अहवाल जि. प. प्रशासनाकडे सादर केला आहे. तपासणीअंती प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालावरून सन २०१२-१३ या वर्षातील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातील जीवंत रोपट्याची टक्केवारी ३२.६५ आहे. तर सन २०१३-१४ या वर्षात लागवड करण्यात आलेल्या जीवंत रोपट्याची टक्केवारी ४३.५७ आहे. '
निम्म्यापेक्षा कमी वृक्ष जिवंत
By admin | Updated: September 10, 2014 23:39 IST