देसाईगंज : शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. ही बाब जिल्हा तसेच राज्यभरातील गावातील नागरिकांसाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील कसारी गावाने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन ‘ग्राम उदय से भारत उदय’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार क्रिष्णा गजबे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पालक सचिव विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, उपमुख्य कार्यकारी आधिकारी शालिक धनकर, कार्यकारी अभियंता सोनोने, समाज कल्याण अधिकारी पेंदाम, बाबरे, पं. स. सदस्य परसराम टिकले, शांताबाई तितीरमारे, जि.प. सदस्य पल्लवी लाडे, सरपंच तिर्था पुसाम, तहसीलदार मडावी, गट विकास अधिकारी संगिता भांगरे, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, संचालन ग्राम विकास अधिकारी पी. एल. पेशने तर आभार संगीता भांगरे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी गावात फेरफटका मारून विकास कामांची माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)
कसारी गाव जिल्ह्यासाठी आदर्शवत
By admin | Updated: April 18, 2016 03:59 IST