पालकमंत्र्यांच्या हस्ते : जलयुक्त शिवारमधून ५० कामे पूर्ण गडचिरोली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोमवारी तालुक्यातील कळमटोला येथील सीताबाई देविदास गेडाम यांच्या शेतावर राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जयंत पिळगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते. कळमटोला हे गडचिरोलीच्या उत्तर पूर्वेस असून गडचिरोलीपासून १४ किमी अंतरावर आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्र ६४५.५१ हेक्टर आहे. येथे एकूण ६३ सिंचन विहिरी आहेत. या ठिकाणी धानाचे मुख्य पीक असून त्याची उत्पादकता १४०० किलो तांदूळ प्रतिहेक्टर आहे. मुख्यत्वे कळमटोला हे गाव कोरडवाहू असून या गावात नदी, नाले नाहीत. येथे ८७.५५ हेक्टर शेती सिंचन क्षेत्र आहे. त्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या कृती आराखड्यात करण्यात आली. याअंतर्गत या गावात कृषी विभागाच्या वतीने एकूण जलसंधारणाची ५० कामे पूर्ण करण्यात आली. पंचायत समितीमार्फत या गावात जलसंधारणाची १३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून येथे सिंचन सुविधा निर्माण झाली असल्याने हरितक्रांतीकडे वाटचाल सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कळमटोला येथे जलपूजन
By admin | Updated: August 18, 2016 01:42 IST