आरमोरी : ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिल्याने ग्राम पंचायतमध्ये रखडलेला गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती जि. प. सदस्य अमोल मारकवार यांनी दिली आहे. मागील पाच वर्षांत आरमोरी शहराचा झपाट्याने विस्तार होणे सुरू आहे. शहराच्या सभोवताल नवीन वस्त्यांची निर्मिती होत आहे. मात्र नवीन वस्त्यांमधील जमिनी गावठाणमध्ये मोडत नसल्याने या जागेवर घर बांधलेल्या नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. शासनाने आरमोरीला नगर पंचायतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गावठाणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. आरमोरी शहरातील इंदिरानगर, बर्डी, डोंगरी, काळागोटा, शेगाव टोली, येथील नागरिकांनी घरे बांधले आहेत. मात्र त्यांना अजूनपर्यंत मालकी हक्क प्रदान करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ग्राम पंचायतीच्या वतीने सवलती मिळण्यासही अडचण जात होत्या. नगर पंचायत स्थापन झाल्याने घरांचे मालकी हक्क मिळणार आहे. त्याचबरोबर खरेदी-विक्रीचे व्यवहारही सुलभ होण्यास मदत होणार आहे. या जागेवर कर्जही मिळणार आहे. त्याचबरोबर या भागातील वस्तींचा विकास करण्यासाठी नगर पंचायत विशेष निधी उपलब्ध करून देऊ शकणार आहे. नगर पंचायतीची स्थापना झाल्याने शासनाकडून मिळणाऱ्या निधीत वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा जि. प. सदस्य मारकवार यांनी व्यक्त केली आहे.
नगर पंचायत निर्मितीने गावठाणाचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:38 IST