देसाईगंज : देसाईगंज येथे आरमोरी मार्गालगत व जुनी वडसा मार्गालगत वन विभागाची जवळपास ७० ते ८० हेक्टर मोकळी जमीन असून ही जमीन वन विभागाकडून खुली करण्यात आली की काय, याबाबत जनतेमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक एफडीसीएमच्या विभागीय कार्यालयाकडून वरिल जमिनीला तारेचे कुंपन घालण्याचे काम सुरू असून जुनी वडसा रोडवरील मोठ्या नाल्याजवळील जवळपास दोन हेक्टर जागा व वडसा गावालगतची जवळपास दोन हेक्टर जागा अतिक्रमणाच्या सबबीखाली सोडण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार नगर पालिका या नागरी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वन जमिनीवरील अतिक्रिमणीत जमिनीचे पट्टे कुणालाही मंजूर करता येणार नाही, असे असताना व वन विभाग स्वत: सक्षम विभाग असताना क्षुलकशा अतिक्रमणाच्या सबबीअंतर्गत अतिक्रमणीत जागा कशी काय सोडू शकते, असा प्रश्न नागरिकांनाही निर्माण झाला आहे. याबाबत कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. वडसालगतच्या अतिक्रमणधारकांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेच परंतु ज्या भागामधून नगर पालिकेची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे, त्या जागेत सुद्धा अतिक्रमण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात देसाईगंज रोड रूंदीकरणाचा प्रश्न जर निर्माण झाला तर वरिल अतिक्रमणाचा प्रश्न निश्चितपणे गंभीर होणार आहे. त्यादृष्टीने पालिकेने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वरिल वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणीत जागा सोडण्यात आल्यामुळे सर्व साधारण बेघर असलेल्या जनतेकडून उर्वरित जागेवर जर निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण झाले तर वन विभाग काय भूमिका घेते हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. देसाईगंज पालिकेकडून रुग्णालयाच्या इमारतीसाठी पाच एकर जागा वरिल जमिनीमधून मंजूर करण्याकरिता शासनाला विनंती करण्यात आली होती.
वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण वाढतीवर
By admin | Updated: July 9, 2015 01:47 IST