मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, ठप्प पडलेली शैक्षणिक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुरु करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गावातीलच होतकरू व्यक्तींचे स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात येत आहेत. गावागावात शाळेसारखे वातावरण निर्माण करून वर्ग सुरु करण्यात येत आहेत. कैवल्य फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन व नीती आयोगाच्या मदतीने विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
कुरखेडा तालुक्याच्या वडेगाव येथील विद्या विकास हायस्कूलचे शिक्षक रमेश मडावी यांनी कैवल्य फाऊंडेशनचे तालुका समन्वय कुणाल गुरुनुले यांची भेट घेत वडेगावमधील मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. सदर काम पूर्ण करण्यासाठी गावातील काही मुख्य व्यक्तीची भेट घेऊन स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. नगमा सय्यद व तीजीया फुल्गुवार या दोन तरुणींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गावात दोन केंद्र उभारण्यात आले.
सुरुवातीला मुलांचा प्रतिसाद थोडा कमी होता पण हळूहळू मुलांमध्ये उत्साह वाढतच गेला आणि वडेगाव येथे केंद्र सुरु झाले. या केंद्रावर ४०-४५ विद्यार्थी रोज येतात. गाणी गातात, गप्पा करतात, नवीन नवीन उपक्रम करून बघतात. स्वत: स्वतःला शिक्षणात गुंतवून ठेवतात.
कोट........
मुले ही आपली भविष्याची शिदोरी आहे आणि कोरोनाकाळात जर ही मुले शिक्षणापासून वंचित राहिली तर येणारी आपत्ती ही खूप भयावह असेल. म्हणून या मुलांना शिक्षणात गुंतवून ठेवणे ही सध्याची परिस्थिती लक्षात घेता काळाची गरज आहे. - कुणाल गुरुनुले, तालुका समन्वयक, कैवल्य फाऊंडेशन