कौसर खान
सिराेंचा : सततच्या पुरामुळे गाेदावरी व प्राणहिता नद्यांचे पात्र खचून नदीलगत असलेली अनेक शेतकऱ्यांची शेकडाे हेक्टर सुपीक जमीन नदीत विलीन झाली आहे. परिणामी या शेतकऱ्यांवर भूमिहीन हाेण्याची पाळी आली आहे. ही भरून न निघणारी हानी टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिराेंचा तालुक्याला प्राणहिता व गाेदावरी या दाेन नद्यांचा वेढा आहे. अनेक गावे नदीजवळ वसली आहेत. काही शेतकऱ्यांची शेतजमीन अगदी नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात येत असलेल्या पुरांमुळे नदीचे पात्र खचत जाते. त्यामुळे नदीकाठाजवळची जमीन नदीत लुप्त हाेत चालली आहे. यावर्षी जवळपास ४०० हेक्टर जमीन नदीत लुप्त झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नदीकाठची जमीन सुपीक असल्याने शेतकरी या शेतजमिनीवर प्रामुख्याने मका, ज्वारी, मूग, मिरची आदी पिकांची लागवड करीत हाेते. नदीच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध हाेत हाेती; मात्र या जमिनीवर आता रेतीचा थर जमा झाला आहे. त्यामुळे त्यात काेणतेच उत्पादन घेणे शक्य नाही. शेतीतून निघणारे उत्पादन बंद झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. महसूल विभागाने या जमिनीचा सर्व्हे करून ज्या शेतकऱ्यांची जमीन नदीत गेली आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी हाेत आहे.