गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसत आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजतापासून रात्रभर झालेल्या पावसाची नोंद प्रशासनाने घेतली असून एकूण २०५.२ मिमी पाऊस झाला असून सरासरी १७.५ असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. दमदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. जिल्हाभरातील शेतकरी अनेक कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. गडचिरोली तालुक्यात ३.४ मिमी, धानोरा १.८, चामोर्शी ८.०, मुलचेरा ३५.०, अहेरी ५.०, एटापल्ली ४३.४, भामरागड ९६.४, सिरोंचा तालुक्यात १४.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजतापासून मेघगर्जनेसह गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी तालुक्यासह इतरही भागात पाऊस बरसला. मेघ गर्जनेसह झालेल्या पावसामुळे गडचिरोली शहरात दिवसभर विद्युत पुरवठ्याचा लंपडाव सुरू होता. इंटरनेट सेवाही वारंवार विस्कळीत होत होती. यामुळे शासकीय व खासगी कार्यालयातील आॅनलाईन कामकाज प्रभावित झाले. (स्थानिक प्रतिनिधी)
दमदार पावसाची हजेरी
By admin | Updated: June 20, 2015 02:11 IST