पे्ररणादायी उपक्रम : भोई व ढीवर समाजाचा पुढाकारचामोर्शी : शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात जलकुंभी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर वनस्पती काढण्याची मोहीम ढिवर व भोई समाजातील नागरिकांनी शुक्रवारपासून हाती घेतली. त्यांच्या या कार्याची नागरिकांकडून प्रसंशा केली जात आहे. भोई व ढिवर समाजाची जय वाल्मिकी मासे पाणी संस्थाही नोंदणीकृत आहे. या संस्थेला सदर तलावातील मासे पकडण्याचे अधिकार पंचायत समिती प्रशासनाकडून लिजवर देण्यात आले आहेत. जय वाल्मिकी संस्था दरवर्षी या तलावात मत्स्यबिज सोडून मासेमारीचा व्यवसाय करते. मात्र मागील काही वर्षांपासून या तलावात मोठ्या प्रमाणात जलकुंभी वनस्पती वाढली. त्यामुळे मासेमारीस अडचण निर्माण होत होती. त्याचबरोबर याचा परिणाम मास्यांच्या वाढीवरही झाला होता. याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद सिंचाई विभागाकडे पाठपुरावा करून सदर वनस्पती काढण्याची अनेकवेळा मागणी केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी भोई व ढिवर समाजाच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तलावातील जलकुंभी वनस्पती काढण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरूवात केली. तिसऱ्या दिवशीही सदर मोहीम सुरूच होती. यामध्ये भोई व ढिवर समाजाच्या शेकडो महिला व पुरूषांनी सहभाग घेतला आहे. याच तलावात शहरातील गणपती, दुर्गा, शारदा यांचे विर्सजनही केले जाते. त्यामुळे नगर पंचायतीनेही सदर वनस्पती काढण्यासाठी भोई व ढिवर समाजाच्या नागरिकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)कपडे धुण्यासही अडचण सदर तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील शेकडो महिला या तलावात कपडे धुण्यासाठी जातात. प्रशासनाच्या वतीने तीन धोबीघाट तयार करण्यात आले आहेत. या धोबीघाटांजवळही जलकुंभी वनस्पती वाढली असल्याने महिलांना कपडे धुण्यास अडचण येत आहे. जिल्ह्यातील शेकडो तलावांमध्ये अशा प्रकारच्या वनस्पती वाढल्या आहेत. त्यामुळे या तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर त्यांचे सौंदर्यही धोक्यात आले आहे. श्रमदानातून तलावांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे शक्य आहे.
श्रमदानातून तलावातील जलकुंभी वनस्पतींची काढणी
By admin | Updated: June 15, 2015 01:40 IST