पाटण : जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे. या परिसरात सोनापूर येथे तपासणी नाका असूनही ही तस्करी सुरूच असल्याने तपासणी नाक्यावरील कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यातील तुमरीकुडा, नाईकनगर, पाटण, पुन्नागुडा, गणेरी, भाईठार, महाराजगुडा, सेवादासनगर, जिवती आदी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात गारगोट्या आढळून येतात. या जंगलातील गारगोट्याची अवैधरित्या उचल करून ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. जंगलातील गारगोट्या जमा करण्याकरिता शाळकरी मुलांचाही वापर केला जात असून त्यांना १५० ते २०० रुपये मजुरी दिली जात असल्याची माहिती आहे. जंगल परिसरातील काही नागरिक गारगोट्या गोळा करण्याचे काम करतात. अशा नागरिकांकडून अत्यल्प दराने गारगोट्यांची खरेदी करून ती मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री केली जात असून याचा मुख्य दलाल गडचांदूर येथील असल्याची माहिती आहे.या परिसरात सोनापूर येथे वनविभागाचा तपासणी नाका आहे. गौणखनिज व वनातील मौल्यवान वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, याच रस्त्याने गारगोट्यांची तस्करी राजरोसपणे सुरू आहे. ट्रकद्वारे गारगोट्यांची तस्करी सुरू असून पहिल्यांदा गडचांदूर व नंतर तेथून औरंगाबाद, जयपूरसारख्या ठिकाणी या गारगोट्या नेल्या जात आहे. या भागातील बहुतांश वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचांदूर, राजुरा अथवा चंद्रपूरसारख्या ठिकाणी राहून सेवा बजावत असल्याने या तस्करीवर आळा घालण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच या भागात वनाधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर राहात असल्याने या तस्करांचे चांगलेच फावत आहे.
माणिकगड पहाडावरून गारगोट्यांची तस्करी
By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST