खासदारांना साकडे : भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मागणीभामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात जिल्हा निर्मितीच्या ३२ वर्षानंतरही अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी समस्यांमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे खा. अशोक नेते यांनी भामरागड तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन येथील नागरिकांना न्याय द्यावा, अशा मागणीचे साकडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील हरिपद बिश्वास यांच्यासह अनेक नागरिकांनी खासदारांना घातले आहे. या संदर्भात सुनील बिश्वास यांनी खा. अशोक नेते यांना मागण्यांचे लेखी निवेदन केले आहे. निवेदन देताना नाविसचे तालुका सचिव जाधब हालदार, जोगा उसेंडी, भामरागडच्या पं. स. सभापती रंजना उईके, सुनील बिश्वास आदी उपस्थित होते. भामरागड तालुक्यात अनेक समस्या असल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खा. नेते यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिले. (तालुका प्रतिनिधी)या आहेत मागण्याभामरागडच्या ग्रामीण रूग्णालयात सक्षम वैद्यकीय अधिकारी व एक्सरे आॅपरेटरची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी, आदिवासी व गैर आदिवासींच्या शेतजमिनी अतिक्रमणाबाबत दाव्याच्या अटी शिथिल करून कायम स्वरूपी शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या ८० लाखाच्या धान चुकाऱ्याची रक्कम अदा करण्यात यावी, भामरागड येथे वन विभागाच्या नाक्यापासून ते जोगा उसेंडी यांच्या घरापर्यंत रस्ता रूंदीकरण करून पथदिवे लावावे, मंडळ भवन इमारतीच्या कामाला निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे.
भामरागड तालुक्याला न्याय द्या
By admin | Updated: July 22, 2015 02:28 IST