गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी लोकसभेत चार विधेयक सादर केलेत. यामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत रत्न प्रदान करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लोकसभेत विधेयक सादर करून केली. महाराष्ट्र राज्यात विदर्भाच्या भागाकडे विकासाच्याबाबत प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. विकासाचा अनुशेष वाढला असून मुंबईच्या शासनकर्त्याचे विदर्भाकडे लक्ष नसल्याचा आरोप नेते यांनी केला. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून या भागाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकासाला न्याय देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे काम जगातही असून विदर्भातील महान संताला भारतरत्न उपाधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत प्रती माह २ हजार रूपये भत्ता देण्यात यावा, तसेच वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वनकायद्याच्या अटी शिथील करून या जिल्ह्यातील विकासासोबतच जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही विधेयकाद्वारे त्यांनी केली. लवकरच या विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ५ डिसेंबरला स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव त्यांनी मांडला होता.
स्वतंत्र विदर्भ राज्यासह राष्ट्रसंतांना भारतरत्न द्या
By admin | Updated: December 13, 2014 01:53 IST