गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात हिरवीगार वनराई, बारमाही वाहणाऱ्या नद्या तसेच औद्योगिक क्षेत्राचा अभाव असल्याने १५ वर्षापूर्वी येथील हवा शुद्ध होती. आता जिल्ह्यातील वातावरण बदल झाल्याने येथील वायू गुणवत्ता निर्देशांक तिसऱ्या श्रेणीत घसरलेला आहे. जिल्ह्यातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यात फारसे उद्योगधंदे नाहीत. कारखाने किंवा फॅक्टरी नाहीत, तरीसुद्धा जिल्ह्यातील वायू गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.
प्रदूषण मोजणारी यंत्रणाच नाही; कारभार चंद्रपुरातून जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय तर नाहीच शिवाय येथील प्रदूषण मोजणारी यंत्रणाही नाही. चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयातून गडचिरोली जिल्ह्यातील कारभार चालविला जातो.
वायू गुणवत्ता निर्देशांक किती असावा? ५० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक शुद्ध हवेचा मानला जातो. ५१ ते १०० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक मानला जातो. तर १०१ ते २०० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक हवा प्रदूषित असल्याचे नोंद करतो.
गुणवत्ता निर्देशांक ११० जिल्ह्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक १०१ ते १५० च्या दरम्यान आहे. यापूर्वी हा निर्देशांक १०० च्या आतच होता. वायू निर्देशांकाच्या दृष्टीने जिल्ह्यातील वायू शुद्धीकरणाची स्थिती समाधानकारक होती; विविध कारणांमुळे प्रदूषण वाढले.
२.५ मायक्रोमीटर प्रदूषणासाठी धूळ, धूर ठरताहेत कारणीभूतसूक्ष्म धुलीकण श्वसनाद्वारे शरीरात जातात. श्वसनाचे तसेच फुफ्फुसाचे आजार वाढतात.
"एकेकाळी शुध्द हवेचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची भविष्यात प्रदूषित जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही." - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ