देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत जवळपास १७ ही ग्रामपंचायतींत सत्ता स्थापण्याजोगे स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येते. असे असले तरी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलण्यात आली असल्याने सरपंचपदाचा दावेदार म्हणून पुढे येण्यासाठी आपसातच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
नेमकी माळ कुणाच्या गळ्यात हे सरपंचपदाच्या सोडतीनंतरच स्पष्ट होणार असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सरपंच होण्याची स्वप्न रंगवणाऱ्यांची चांगलीच गोची झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मात्र, यामुळे संभ्रमात सापडले आहेत. देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १७ ग्रामपंचायतींच्या एकूण ५९ प्रभागांतील १६१ उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २६ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. यात तब्बल २१ महिला तर ५ पुरुष उमेदवारांचा समावेश होता. दरम्यान, १३५ उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या तब्बल ३१४ उमेदवारांपैकी रथी महारथींना जबर धक्का देत अनेक नवखे उमेदवार निवडून आले आहेत. अशातच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावविकासाच्या दृष्टिकोनातून सरपंचपदी योग्य उमेदवाराची निवड होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. असे असले तरी सरपंचपदाच्या सोडतीशिवाय ठोस निर्णय घेणे शक्यच नसल्याने पदावर शिक्कामोर्तब करणे अद्यापतरी शक्य होऊ शकले नाही. देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावांत अनुभवी व नवखे उमेदवारांना निवडून देण्यात आले असले तरी काहींची पार्श्वभूमी पाहता जबाबदारीचे पद सोपविताना या पदावर चुकीच्या व्यक्तीची निवड होऊ नये, यासाठीही वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
बाॅक्स...
महिला उमेदवारांनाही मिळणार संधी
अनेक गावांत चुकीच्या व्यक्तीच्या हातात पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तब्बल ८६ महिला उमेदवार व ७५ पुरुष उमेदवारांची १७ सरपंचपदी निवड होणेच असल्याने व सद्य:स्थितीत महाविकास आघाडी समर्पित ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचीच भाऊगर्दी झाली असल्याने आरक्षणानुसार सरपंच निवडताना तो गावासाठी कलंक तर ठरणार नाही ना? याचीही खबरदारी घ्यावीच लागणार आहे.
तथापि, पदाच्या सोडतीचा चेंडू सध्यातरी सोडतीच्या कोर्टात असल्याने लागलेल्या निकालावरून १७ ही ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार हे जवळपास स्पष्ट असले तरी दरम्यान घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.