पोलिसांचे सहकार्य : अडीच हजार लोकांनी श्रमदानातून दुरूस्त केला १८ किमीचा रस्तारमेश मारगोनवार भामरागडगेल्या दोन वर्षांपासून केवळ रस्ता चांगला नाही म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बंद केलेली प्रवाशी बससेवा मंगळवारपासून भामरागड तालुक्याच्या मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरात सुरू झाल्याने परिसरातील २२ गावातील नागरिकांनी जल्लोष साजरा केला. भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. या तालुक्यातील मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील २२ गावांना जोडणारा रस्ता पूर्णत: उखडून गेला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बसफेरी बंद झाली होती. मुख्यमंत्री पालकमंत्री यांना निवेदन देऊनही नक्षलवाद्यांच्या दबावामुळे रस्ता दुरूस्तीचे काम करण्यास कंत्राटदार तयार होत नाही. ही सबब सांगत रस्त्याची दुरूस्तीही रखडलेली होती. अखेर २२ गावातील ग्रामस्थांनी ताडगाव पोलिसांना साकडे घातले व रस्ता दुरूस्त करून द्या, अशी विनंती केली. पोलिसांनी स्वत: श्रमदान करण्याची तयारी दाखविल्यावर २२ गावातील अडीच हजार लोक श्रमदानासाठी तयार झाले व तब्बल १८ किमीचा रस्ता मुरूम, माती, दगड टाकून तयार करण्यात आला. पोलीस प्रशासनाने रस्ता तयार झाल्याची माहिती अहेरी राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराला दिल्यावर मंगळवारपासून अहेरी-आलापल्ली-ताडगाव-मन्नेराजाराम-भामनपल्ली अशा साधारण चार बसफेऱ्या दिवसाला सुरू करण्यात आल्या आहेत. बसफेरी सुरू झाल्याने नागरिकांनी जल्लोष साजरा केला. ही बससेवा सुरू झाल्याने मन्नेराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली गावातील लोकांना बस सेवेचा लाभ मिळणार आहे.
मन्नेराजाराम परिसरात चार बसफेऱ्या सुरू
By admin | Updated: September 24, 2016 03:00 IST