मुख्य वनसंरक्षकांची माहिती : सहा लाख वृक्षांची होणार लागवडगडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कालावधीत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यासाठी वन विभाग सज्ज आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी दिली आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदलले निसर्ग व ऋतू चक्र, अनियमित पर्जन्यमान हे पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याची जाणीव करून देत आहे. पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे विशेष महत्त्व आहे. वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे वनांवर होणाऱ्या अनिष्ठ परिणामाची व पर्यायाने पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन शासनाने वनमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. गडचिरोली वन विभाग स्वत: ५ लाख वृक्ष लागवड करणार आहे. एक लाख वृक्षांच्या लागवडीबाबत जिल्हा नियोजन समितीने नियोजन केले आहे. १ जुलै या एकाच दिवशी जिल्हाभरात किमान ६ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा लोकसहभाग घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जास्तीत नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीही वृक्ष लागवडीला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
वृक्ष लागवडीसाठी वनविभाग सज्ज
By admin | Updated: May 6, 2016 01:15 IST