वृक्षारोपण कार्यक्रमावर परिणाम होणार : अडीच रूपयाने झाली दरवाढगडचिरोली : राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत राज्यभरात शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांना वृक्षारोपण करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात विविध प्रजातीचे रोप उपलब्ध करून दिल्या जातात. गतवर्षीपर्यंत ५० पैशात हे रोप सामाजिक वनीकरण विभाग विक्री करीत होता. यंदा तब्बल अडीच रूपयाने रोपांची किंमत वाढवून तीन रूपये दराने रोप विकल्या जाणार आहे. या भाव वाढीचा फटका वृक्षारोपण कार्यक्रमाला बसणार असून शाळा, महाविद्यालयांना महागडी वृक्ष खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. राज्य शासनाने २२ जुलै रोजी निर्णय घेऊन सन २०१५ मधील पावसाळ्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेताना वन/सामाजिक वनीकरणामार्फत तीन रूपये प्रती रोप दराने रोपांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीपर्यंत ५० पैसे किंमतीत हे रोप उपलब्ध केले जात होते. यावर्षी शासनाने यात बदल केला आहे. ज्या शाळा सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून स्वत: रोप आणणार आहेत. अशा शाळांना ५० पैसे दराने रोप उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र विद्यार्थी व शिक्षकांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, रोपांची शाळेपर्यंत वाहतूक करणे या कार्यक्रमासाठी आगाऊ अडीच रूपये घेतले जाणार आहेत. अशा शाळांना तीन रूपये प्रती रोप दराने रोप उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आजपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात लाखो रोपट्यांची लागवड करण्यात आली. त्यावर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. मात्र त्यापैकी ५ टक्केही वृक्ष जिवंत राहिलेली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या योजनेवर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला असल्याची टीका होत आहे. हा आगाऊचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने रोपांच्या वाढीव किंमतीस मान्यता दिली असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात तालुका मुख्यालय ते गावाचा अंतर ७० ते ८० किमीच्या फेऱ्यात येते. त्यामुळे अशा गावातील शाळा, महाविद्यालयांना आता वाहतूक खर्चासाठी महागडी रोप घेताना मोठी आर्थिक अडचण होणार आहे. त्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रमावर थेट परिणाम होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वन विभागाने रोपांचे दर वाढविले
By admin | Updated: July 24, 2015 01:31 IST