गडचिरोली : केंद्र शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार ९१८ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. एपीएलमधील ३७ हजार ८१५ कुटुंबांना प्राधान्य कुटुंब म्हणून अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. देशातील एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने देशभरात अन्नसुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील ८0 कोटी जनतेला अत्यंत कमी किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ७५ टक्क्याहून अधिक व शहरी भागातील ५0 टक्क्याहून अधिक कुटुंबाचा अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येते. सदर अन्नधान्य ३ रूपये किलो तांदूळ, २ रूपये किलो गहू व १ रूपये किलो भरड धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिवसेंदिवस अन्नधान्याच्या किंमती गगणाला भिडलेल्या असल्याने दिवसभराच्या मजुरीतून दोन वेळच्या जेवणापुरतेही अन्न खरेदी करणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अत्यंत कमी किंमतीमध्ये राशन उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे आजपर्यंत अर्धपोटी उपाशी राहणारी कुटुंबांना फार मोठा आधार झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ११ हजार ५१७ राशन कार्डधारक आहेत. यामध्ये एपीएलधारक ३९ हजार ३६१, अंत्योदय योजनेचे ९0 हजार ७४२, प्राधान्य कुटुंबातील ३७ हजार ८१५, केशरी ३६ हजार १७८ व पांढर्या रंगाचे ७ हजार ४२१ कार्ड आहेत. यापैकी बीपीएल, प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्राधान्य कुटुंब हे एपीएलधारक कुटुंब आहेत. त्यामुळे या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. मात्र या कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यातील आजपर्यंंत ३७ हजार ८१५ एपीएल कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आहे. या भागामध्ये रोजगाराचे साधन नाही. तेंदूपत्त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न व शेतीच्या भरवशावर वर्षाभराच्या खर्चाचे नियोजन करावे लागते. या नागरिकांसाठी सदर योजना अत्यंत चांगली असली तरी या योजनेची माहितीच बहुतांश नागरिकांना नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून सदर नागरिक वंचित राहत असल्याचे दिसून येते. प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांनी या योजनेची अजूनपर्यंत दुर्गम भागातील नागरिकांना माहिती दिली नाही. शहरी भागातील नागरिक मात्र या योजनेमध्ये स्वत:चा समावेश व्हावा, यासाठी धडपड करीत आहे. वेळप्रसंगी तलाठय़ाकडून कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ग्रामीण भागातील नागरिकापेक्षा शहरी भागातील नागरिकांची उत्पन्नाची र्मयादा जास्त असल्याने योजनेत समावेश होण्यास अडचन येत आहे. गहू केवळ २ रूपये किलो प्रमाणे प्राप्त होतो. मात्र गहू दळण्यासाठी ५ रूपयाचा खर्च येत आहे. त्यामुळे सदर गहू नागरिकांना ७ रूपये किलो प्रमाणे पडत आहे. तांदळाची किंमत ३ रूपये किलो असली तरी त्यानंतर तांदळावर खर्च होत नाही. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ खरेदीला पसंती दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
१ लाख ६८ हजार कुटुंबांना अन्न सुरक्षेचे कवच
By admin | Updated: May 15, 2014 23:34 IST