विलास चिलबुले - आरमोरीजिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या आरमोरी ग्राम पंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यावरील ५० ते १०० खड्डे बुजविण्यासाठी पाच लाखाचा निधी खर्च केल्याची बाब उजेडात आली आहे. झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गतवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत चौकशी समिती गठित करण्यात आली होती. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही या प्रकरणाची चौकशी झाली नाही. आरमोरी गावात अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी पाच लाखाची तरतूद करण्यात आली. या कामासाठी २३ हजार ३०० रूपयाचा मुरूमही खरेदी करण्यात आला, असे ग्राम पंचायतीने आपल्या दस्तावेजात म्हटले आहे. प्रत्यक्षात गावातील एकही खड्डा ग्राम पंचायतीने बुजविलेला नाही. या पाच लाख रूपयात ग्रामसेवक व पदाधिकारी यांनी संगनमत करून पैशाचा अपहार केला, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्राम पंचायत मात्र वार्ड क्रमांक एक ते सहामध्ये राममंदिर, विठ्ठलमंदिर, पटेल चौक, पांदन रोड, इंदिरा गांधी चौक ते दुर्गा मंदिर, पटेल चौक ते गायकवाड चौक-दुर्गामंदिर, फुले चौक, आझाद चौक, पंचायत समिती ते आझाद चौक ते गुजरी रोड या मार्गावरचे खड्डे बुजविले, असा दावा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक खड्डे जैसे थे आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी ए.एन. डाखरे यांनी ३०० खड्डे बुजविण्याचे सांगितले.
खड्ड्यात गेले पाच लाख
By admin | Updated: February 2, 2015 23:06 IST