भामरागड : तालुक्यात १८ जूनच्या रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या व संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी परिश्रमानंतर आठ दिवसांत भामरागडचा वीज पुरवठा सुरळीत केला. परंतु २४ दिवसांचा कालावधी उलटूनही प्रकल्प कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती आदीमधील वीज पुरवठा खंडीतच आहे. त्यामुळे या कार्यालयातील शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. जनरेटर लावून हे काम सुरू करण्यात आले आहे. २० जूनला पूर ओसरला. तातडीने वीज दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. वीज महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडे हे काम सोपवून स्वत: मोकळे झाले आहे. परंतु कंत्राटदार आला नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांनीच रात्रंदिवस परिश्रम करून आठ दिवसानंतर भामरागड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व भामरागड गावातील वीज पुरवठा सुरू केला. कोठी, लाहेरी, नारगुंडा, धोडराज परिसरातील वीज दुरूस्तीच्या कामासाठी ठेकेदार आले नाही. अखेरीस संतापलेल्या लाहेरी परिसरातील १०० नागरिकांनी भामरागडात पोहोचून आपली आपबिती सांगितली. रात्री संकटाचा कसा सामना करावा लागतो, हे ही सांगितले. त्यानंतर दोन दिवसाने लाहेरीचा वीज पुरवठा सुरू झाला. भामरागड येथील अभियंत्याकडे अत्यंत कमी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. दुरूस्ती पथकाचे सामान नेण्यासाठी वाहनही नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना दुर्गम गावांपर्यंत पोहोचताना अडचण निर्माण होत आहे. सोमवारपर्यंत कोठी, नारगुंडा परिसर अंधारातच होता. २० दिवस उलटूनही येथे वीज पुरवठा सुरू झाला नाही तर भामरागडातील प्रमुख शासकीय कार्यालयात २४ दिवसानंतरही वीज आली नाही. त्यामुळे यामध्ये आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, आयटीआय, पंचायत समिती कार्यालय यांचा समावेश आहे. तालुक्यात वादळी पावसामुळे महावितरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आणखी किती दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागेल, याविषयी शांसकताच आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनाही आढावा बैठकीत याची माहिती देण्यात आली व तालुक्यातील महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे व कार्यालयाला पथकाचे वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. परंतु पालकमंत्र्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)
२४ दिवसानंतरही भामरागडातील कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीतच
By admin | Updated: July 15, 2015 01:44 IST