सिरोंचा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
सिरोंचा : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. नगर पंचायतीने शहरात फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कॉम्प्लेक्स मार्गावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांसाठी इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यात नागरिकांची गर्दी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या बाजुला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर अतिक्रमणाची संख्या वाढली आहे.
प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने
कुरखेडा : कुरखेडा मार्ग तसेच विश्रामगृह परिसरात नेहमीच पार्र्किंग केलेली वाहने रस्त्याच्या कडेला दिसून येतात. तर दुसºया बाजुला ट्रान्सपोर्ट करणारे मालवाहू ट्रक उभे करून त्यातील माल उतरविण्यापासून सर्व कारभार रस्त्यावरच चालत असतो. येथे वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावात विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. सातत्याने मागणी करूनही महावितरणच्या अधिकाºयांचे दुर्गम गावांमध्ये वीज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच
देसाईगंज : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
बँकांअभावी विकासावर परिणाम
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाला आहे.
हातगाडी व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. सदर हातगाड्या हटविण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.
प्राथमिक उपकेंद्रांसाठी इमारती बांधा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसुती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसुतीसाठी न्यावे लागत आहे. संस्थांतर्गत प्रसुती वाढण्यासाठी उपकेंद्रांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
दुर्गम भागातील कर्मचाºयांचे अपडाऊन
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच धानोरा, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करणाºया कर्मचाºयांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे.
वीज चोरीकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरात तसेच परिसरातील ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या सुमारास वीज कर्मचारी गावात येत नाही. याची खात्री ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना असल्याने रात्रीच्या सुमारास आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे. आजही ग्रामीण भागात अनेक ग्राहकांकडे जुनेच मीटर आहेत. या मीटरवर छेडछाड करून वीज चोरी केली जात आहे. मात्र वीज कंपनीचे कर्मचारी व अधिकारी घरबसल्याच कागदी घोडे रंगवित आहेत.
पंचायत समित्यांमध्ये डिझेल इंजिन धूळखात
गडचिरोली : डिझेलचा भाव वाढल्याने शेतकरी वर्ग विद्युत पंप घेण्याकडे वळला आहे. मात्र जिल्हा परिषद अजुनही डिझेल इंजिनचा पुरवठा करीत आहे. शेतकरी ५० टक्के अनुदानावर डिझेल इंजिन खरेदी करण्यास तयार होत नाही. त्यामुळे या इंजिन धूळखात पडल्या आहेत. विद्युत पंप देण्याची मागणी शेतकºयांकडून आहे. डिझेल इंजिनवरील लाखो रूपये पाण्यात गेले आहेत.
प्रेशर हॉर्नमुळे
ध्वनी प्रदूषणात वाढ
देसाईगंज : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाºया वाहन चालकांविरूद्ध कारवाई होत नाही. ध्वनीप्रदूषणात वाढ झाल्यने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहन धारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
वनोपजावर आधारित उद्योग उभारा
एटापल्ली : जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. राळ, डिंक, मोहफूल, हिरडा, बेहडा व आवळा आदी वनोपजावर आधारित उद्योग उभारावेत, अशी मागणी जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाºया नागरिकांकडून होत आहे.
कुरखेडातील अंतर्गत नाल्या तुंबल्या
कुरखेडा : शहरातील नाल्यांचा ग्राम पंचायतीच्या वतीने अनेक दिवसांपासून नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत.
खाद्य पदार्थांची रस्त्यावरच विक्री
चामोर्शी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे.
सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू करा
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसापासून बंद आहे. लिफ्टची व्यवस्था केल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस लिफ्ट सुरू होती. त्यानंतर लिफ्ट बंद करण्यात आली. लिफ्ट सुरू करण्याची मागणी होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांचा विकास करा
सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. परिणामी या गावांचा विकास खुंटला आहे.
आश्रमशाळा मानधन शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित
आलापल्ली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, भामरागड व अहेरी या तिन्ही प्रकल्पा अंतर्गत आश्रमशाळेत तासिका तत्त्वावरील मानधन शिक्षक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. मात्र या शिक्षकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबितच आहे.