स्वतंत्र बसफेरी सुरू करा : आगार व्यवस्थापकाला निवेदन सादरदेसाईगंज : केंद्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा योजना राबविल्या जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना गडचिरोली आगाराच्या वतीने पासेस देण्यात आले आहे. मात्र वडसा-कुरखेडा मार्गावर विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात आली नाही, तसेच इतर बसेस कसारी, शंकरपूर प्रवासी थांब्याजवळ थांबत नाही. यामुळे विद्यार्थिनींची अडचण होते. एसटी महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या विरोधात विद्यार्थिनींनी एल्गार पुकारला आहे. येत्या सात दिवसात कुरखेडा-देसाईगंज मार्गावर मानव विकास मिशनच्या माध्यमातून आगाराने स्वतंत्र बसफेरी सुरू न केल्यास महामंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारणार असा इशारा विसोरा येथील विनायक विद्यालयात शिकत असलेल्या कसारी व शंकरपूर येथील शेकडो विद्यार्थिनींनी दिला आहे. आगार व्यवस्थापकाला दिलेल्या निवेदनात विद्यार्थिनींनी म्हटले आहे की, शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना गडचिरोली आगाराने मोफत बस पासेस दिल्या आहेत. तसेच इयत्ता पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत बसपास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र गडचिरोली आगाराच्या वतीने कुरखेडा-देसाईगंज मार्गावर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात आली नाही. तसेच आगाराच्या इतर प्रवाशी बसेस प्रवाशांची गर्दी असल्याच्या कारणावरून कसारी व शंकरपूर या गावाच्या प्रवाशी थांब्यावर थांबत नाही. परिणामी विद्यार्थिनींना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. याबाबीची दखल घेऊन गडचिरोली आगार व्यवस्थापकाने शाळेच्या वेळेत सकाळी १०.४५ व सायंकाळी ५ वाजता बसफेरी सुरू करावी, अशी मागणी विसोरा येथील विनायक विद्यालयाच्या तब्बल ७८ विद्यार्थिनींनी स्वाक्षरीनिशी लेखी निवेदन देऊन आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. (वार्ताहर)
विद्यार्थिनींचा एसटी बससाठी एल्गार
By admin | Updated: July 26, 2015 02:45 IST