वीज विभागाचे दुर्लक्ष : जुन्या रोहित्रामुळे समस्या देसाईगंज : शहरातील हनुमान वॉर्डात मागील पाच वर्षात घरांची संख्या व लोकसंख्या दुप्पटीने वाढली. त्यानुसार वीज जोडण्याही दुप्पट झाल्या. परंतु २५ वर्षांपूर्वी लावलेले रोहित्र अजूनही कायम आहे. त्यामुळे या वॉर्डात कमी विद्युत दाबाचा पुरवठा होत असल्याने काही विद्युत उपकरणे सुरू होत नाही. फेब्रुवारी महिना संपण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. हनुमान वॉर्डात जुनी वसाहत असताना या ठिकाणी रोहित्र लावण्यात आले होते. याच रोहित्रावर अजूनही काम भागविल्या जात आहे. त्यामुळे कमी विजेच्या दाबाची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात कुलर, फ्रिज, एसी सुरू होत असल्याने विजेचा वापर वाढतो. त्यामुळे विजेचा दाब कमी होते. त्यामुळे बरेचशे विद्युत उपकरणे सुरूच होत नाही.याबाबत वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याकडे वॉर्डवासीयांनी तक्रार केली असता, नवीन रोहित्र लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, असे सांगून रोहित्र लावण्यास टाळाटाळ करीत आहेत. प्रत्यक्षा नगर परिषद प्राथमिक शाळेजवळ बडोले यांच्या घराच्या बाजुला ओपन स्पेस आहे. या ठिकाणी रोहित्र लावणे सहज शक्य आहे. परंतु या बाबीकडे वीज वितरण विभाग दुर्लक्ष करीत आहे. वीज बिल वसुलीसाठी तगादा लावणारा वीज विभाग ग्राहकांच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष घालून या ठिकाणी नवीन रोहित्र लावावे, अशी मागणी होत आहे. कमी वीज दाबामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एक महिन्याच्या आत बिघाड दुरूस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कमी वीज दाबाने नागरिक त्रस्त
By admin | Updated: February 22, 2016 01:41 IST