गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर १२ मे मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बदल्यांसंदर्भात अहवाल शासनास पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला व जोपर्यंंत शासनाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत कोणत्याही विभागाच्या बदल्या करू नयेत असा ठराव घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीस जि. प. अध्यक्षा भाग्यo्री आत्राम, उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, महिला व बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, कृषी सभापती अतुल गण्यारपवार, बांधकाम सभापती छाया कुंभारे, जि. प. सदस्य विश्वास भोवते, अमोल मारकवार, अजय कंकडालवार, प्रशांत कुत्तरमारे, यशवंत धुडसे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या बदल्यांबाबत वादंग सुरू आहे. या बदल्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांची चमू नुकतीच गडचिरोली जिल्हा परिषदेत येऊन गेली होती. यामुळे मंगळवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बदल्यांबाबत वादळी चर्चा झाली. बदल्यासंदर्भात अहवाल शासनास पाठविण्याचा व जोपर्यंंत शासनाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंंत कोणत्याही विभागाच्या बदल्या करण्यात येऊ नये, असा ठराव पारित करण्यात आला. नुकतेच जिमलगट्टा येथे रूग्णवाहिका न मिळाल्याने बैलबंडीत प्रसुती होऊन नवजात बालकाचा मृत्यू झाला होता असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका पुरविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. कृषी विभागाचे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे जि. प. च्या कृषी विभागाची प्रतिमा मलीन असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी योजना राबवितांना गैरप्रकार करू नये अशी तंबी देण्यात आली. यावेळी जि.प.चे अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शासन अहवालापर्यंत बदल्या करू नये
By admin | Updated: May 13, 2014 23:36 IST