गोंडवाना विद्यापीठाने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करून आपली छाप पाडली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून प्रत्येक दीक्षांत समारंभाचे योग्यरीत्या आयोजन केले आहे, असे असताना यावर्षी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चंद्रपुरात आयोजित करण्याचा हेतू काय? राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे चंद्रपूर जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ताडोबा येथे भेट दिली. यादरम्यान आ. किशोर जोरगेवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. यामध्ये गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्याच्या मागणीचा समावेश आहे. विद्यापीठ चंद्रपुरात हलविल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होईल. कोरची, धानोरा, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शेकडाे किमीचे अंतर पार करून चंद्रपूरला शैक्षणिक कामासाठी जाणे अडचणीचे होईल. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतच कायम ठेवावे आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती द्यावी, अशी मागणी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
गाेंडवाना विद्यापीठाचे स्थानांतरण करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST