किन्हाळा/मोहटोला : १ मे हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ५५ वा वर्धापण दिन होता. या दिवशी राज्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण होत असते. मात्र १ मे रोजी शुक्रवारला देसाईगंज तालुक्यातील १९ पैकी कोरेगाव ग्रामपंचायत वगळता इतर एकाही ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाला महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमाचा विसर पडला असल्याचे दिसून येते. १ मे रोजी दरवर्षी सर्व शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांसह सर्व विभागाच्या शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येते. मात्र देसाईगंज तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला नसल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकसहभागातून गावाचा विकास साधला जातो. मात्र ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये ध्वजारोहण करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
ग्रा.पं.ना ध्वजारोहणाचा विसर
By admin | Updated: May 2, 2015 01:30 IST