गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये येत्या २१ सप्टेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यानंतर लगेच विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये असलेली अभद्र युती संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपचे ८, युवाशक्ती आघाडीचे ७, शिवसेनेचे २, नाग विदर्भ आंदोलन समितीचे ४, अपक्ष आमदार दीपक आत्राम यांच्या गटाचे ३ सदस्य आहेत. ३ अपक्ष सदस्य आहेत. १ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहे. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ सदस्याच्या भरवशावर भाजप व युवाशक्तीशी हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. या समिकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद, भाजपला उपाध्यक्षपद, युवाशक्ती आघाडीला दोन सभापतीपद तर राकाँ व भाजपला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले. मात्र गेल्या अडीच वर्षाच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले आहे. विविध राजकीय पक्षात फुट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युवाशक्ती आघाडीही भाजपमध्ये विलिन झाल्याने सत्तेचे राजकीय समिकरण पूर्णपणे बदलले आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीही भाजपच्या खेम्यात दाखल असल्याने अध्यक्षपदासाठी यावेळी जोरदार मोर्चेबांधणी होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे ७ दावेदार या पदासाठी कामाला लागले आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष दुभंगला असून १० पैकी ४ सदस्य एका खेम्यात दाखल आहेत. या खेम्याचे नेतृत्व विद्यमान कृषी सभापती अतुल गण्यारपवार करीत आहे. युवाशक्ती आघाडीचेही दोन सदस्य भाजपमध्ये विलिन झाले आहेत. नाग विदर्भ आंदोलन समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला साथ देण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडे १३ सदस्य असले तरी त्यांचे तोंड तीन गटात विभागलेले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले बहुतांश सदस्य हे अरविंद सावकार पोरेड्डीवार गटाशी निगडीत आहे. या गटाकडे ५ सदस्य आहेत. त्यामुळे काँगे्रस पक्षाचे राजकारण एकखांबी नाही, दुसरीकडे राज्यात शिवसेना, भाजप एकत्रित लढण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेतही नव्या सत्ता समिकरणात भाजपला शिवसेना साथ देण्याची शक्यता आहे. अतुल गण्यारपवार यांनी दीपक आत्राम गटाचे तीन व भाकपचा एक असा एक स्वतंत्र गट निर्माण केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी होणार आहे. विविध गटाच्या फुटीवरच अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)
जि. प. मध्ये मोर्चेबांधणीला वेग
By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST