गडचिरोली : देशातील सर्व जनतेला भारतीय संविधानाने मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केला आहे. हा हक्क सर्वांनी बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी. त्यांना त्यांच्या हक्काची माहिती व्हावी. या उद्देशाने निवडणूक विभागातर्फे ‘इलेक्शन एक्स्प्रेस’ या नावाने फिरत्या रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शनिवारी करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून या जनजागृती मोहिमेची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, नायब तहसीलदार एम. टी. दहीकर, डी. एम. दहीकर, प्रकाश पुप्पुलवार, करपे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार म्हणाले की, या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून मतदारांच्या हक्काबाबत गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तिनही विधानसभा क्षेत्रामध्ये जागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. मतदारांनी सकारात्मक पुढाकार घेत मतदानाचा हक्क बजावावा. जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, शिक्षक, युवक, युवती यांच्यामध्येही मतदार जागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. वृध्द असो किंवा तरूण सर्व जण करा अवश्य मतदान, निर्भय होऊन मतदान करू, देशाचा आम्ही सन्मान करू, मत द्यायला जायचे आहे आपले कर्तव्य पार बजावायचे आहे. असे घोषवाक्य या इलेक्शन एक्स्प्रेसवर लिहिण्यात आले आहे. तिनही विधानसभा मतदार संघातील मोठे गाव तालुका मुख्यालय आदीमध्ये जाऊन ही एक्सप्रेस लोकांना मतदानासाठी जागृत करणार आहे.
जिल्ह्यात धावणार इलेक्शन एक्स्प्रेस
By admin | Updated: September 20, 2014 23:50 IST