कोटमी येथे जनजागरण मेळावा : शेकडो जणांनी घेतला मोफत औषधींचा लाभएटापल्ली : तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भाग असलेल्या कोटमी येथे पोलीस मदत केंद्राच्या वतीने सोमवारी जनजागरण मेळावा आयोजित करून नागरिकांना औषधी व साहित्यांचे वितरण करण्यात आले. या साहित्यांचा लाभ परिसरातील जवळपास दीड हजार नागरिकांनी घेतला. जनजागरण मेळाव्यात महसूल, आरोग्य, कृषी विभागाचे अधिकारी हजर होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने मेळाव्यात ग्रामस्थांना जनावरांसाठी औषधांचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने नागरिकांना शेतीविषयक सल्ला देण्यात आला. तलाठी व ग्रामसेवकांनी नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यासह विविध दाखल्यांचे वितरण केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. मेळाव्यात घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत गावातील अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवून पांरपरिक नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनीही वैयक्तिक नृत्य सादर केले. मेळाव्यात क्रिकेट, व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॅकसुट व खेळाचे साहित्य वितरित करण्यात आले. नागरिक व लहान मुलांना कपडे, भांडी व साहित्याचे वितरण करण्यात आले. स्नेहभोजनाने मेळाव्याचा समारोप करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
दुर्गम गावातील नागरिकांना साहित्य वाटप
By admin | Updated: December 3, 2015 01:44 IST