कोरची : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवार दारूचे वाटप करत आचारसंहिता निवडणूक नियमांचे भंग करणार नाही. यासाठी मुक्तिपथतर्फे ‘दारूमुक्त निवडणूक’ अभियान राबविले जात आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त करण्यासाठी तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी सी. आर. भंडारी व मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांची बैठक पार पडली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा दारूमुक्त करण्यासाठी जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथचे प्रयत्न सुरू आहे. दारू वाटणे किंवा पाजणे हा निवडणुकीच्या नियंत्रणाचा भंग होईल. हा गुन्हा आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांतीपूर्ण वातावरणात पार पडावी. यासाठी तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक ही पूर्णतः दारूमुक्त व्हावी, यासाठी गावागावांत ठराव घेऊन मागणी केल्या जात आहे. मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून गावागावात ‘दारूमुक्त निवडणूक’ संदर्भात जनजागृती केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा दारूचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांकडून ''''''''मी दारूचे वाटप करणार नाही'''''''' अशा आशयाचे संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत. गाव विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व मुक्तिपथ संयुक्तरित्या दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे. आदी बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके उपस्थित होत्या.