५0 हजार रूग्ण : ओडीशा, बिहारमधील रूग्णांची हजेरीदेसाईगंज : तालुक्यातील कोकडी येथे दमा रूग्णांना मासोळीतून औषधोपचार केला जाते. दमा रोगाचे औषध घेण्यासाठी कोकडी येथे जवळपास ५0 हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. औषध घेण्यासाठी पश्चिम बंगाल, बिहार, ओडीशा राज्यातील रूग्णही आले होते. त्यामुळे कोकडी गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे हे मृगनक्षत्राच्या पहिल्या दिवशी दमा रोगाच्या रूग्णांना मासोळीतून औषध देतात. हा औषधोपचार मागील ३१ वर्षापासून ते नि:शुल्क करीत आहेत. कावळे यांचे औषध गुणकारी असल्याचा अनेकांना अनुभव आला असल्याने दरवर्षी औषध घेणार्यांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे हे औषध मृगनक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दिल्या जाते. वर्षातून एकाच दिवशी औषधोपचार केला जात असल्याने नागरिकांची एकच गर्दी उसळली. राज्यासह पश्चिम बंगाल, बिहार व ओडीशा राज्यातूनही काही नागरिक औषध घेण्यासाठी दाखल झाले. खासदार नाना पटोले, आमदार आनंदराव गेडाम, पं. स. सभापती परसराम टिकले, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, माजी आमदार हरिराम वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी ११ वाजता वैद्य प्रल्हाद कावळे यांच्या हाताने दमा औषधी देऊन औषधी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. औषध घेण्यासाठी दरवर्षीच लाखो दमा रूग्णांची मोठी गर्दी उसळते. याचा अनुभव असल्याने बहुतांश नागरिक पहाटेलाच रांगेमध्ये लागले होते. नागरिकांचे जत्थे शनिवारी सायंकाळी कोकडी येथे दाखल झाले. रूग्णांमुळे २ हजार लोकवस्तीचे कोकडी हे गाव फुलून गेले. कोकडीला दरवर्षीच हजारो रूग्ण जात असल्याने रूग्णांना सेवा देण्याबरोबरच गर्दीचा फायदा उचलून उत्पन्नात वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाने कोकडीसाठी स्वतंत्र बसेस सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेट बँक ऑफ इंडिया यांनीसुद्धा नागरिकांना सहकार्य केले. नागरिकांची संख्या लक्षात घेऊन कोणताही दंगा-धोपा होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शिघ्रकृतीदलाचे जवानसुद्धा तैनात करण्यात आले होते. तलाठी पदाची परीक्षा असल्यामुळे महसूल विभागाचा कोणताच अधिकारी मात्र उपस्थित नव्हता. कोकडी गावापासून दोन किमीपर्यंत दमा रूग्णांच्या रांगा लागल्या होत्या. दमा औषधी गणी, भूरभुसा व सारंगी या प्रकारच्या मासोळीतून दिली जाते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मासोळ्या गोळा करण्यासाठी गावच्या मच्छीमारांनी कावळे यांना सहकार्य केले. संपूर्ण मच्छी नि:शुल्क उपलब्ध करून दिली. दमा हा अतिशय भयंकर रोग मानल्या जातो. अनेक प्रसिद्ध डॉक्टरांकडे उपचार करूनही दमा रोग बरा होत नाही. मात्र प्रल्हाद कावळे यांच्या एक दिवसाच्या एका मात्रेने दमा रोग पूर्णपणे बरा होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी औषध घेण्यासाठी कोकडी येथे येणार्यांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)गावकर्यांचे मोलाचे सहकार्य५0 हजारापेक्षा जास्त रूग्ण आले होते. तेवढय़ाच मासोळ्या लागत असल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मासोळ्या गोळा करणे एकट्या माणसाला शक्य होत नाही. गावातील मच्छीमार व भोई समाजाचे नागरिक गणी, भुरभूसा व सारंगी या प्रकारच्या मासोळ्या गोळा करून नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर कोकडीवासीय आपापल्यापरीने रूग्णांना पाणी, अल्पोपहार, मंडप टाकून सावली व रात्री राहण्याची व्यवस्था करून दिली.
दमा रूग्णांची जत्रा
By admin | Updated: June 8, 2014 23:51 IST