आरमोरी/देसाईगंज : प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा येथील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आॅथरिटीच्या वतीने सोमवारी जनमत सभा घेण्यात आली. याला दोन्ही ठिकाणी नागरिक, व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.साकोली-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग २५३ सी या रस्त्याच्या संदर्भात राजीव भवन आरमोरी येथे सभा झाली. ही जनमत सभा राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत घेण्यात आली. स्मिथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर हे या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम करीत आहे. त्यांच्या वतीने अभियंता संदीप आर. जी. यांनी जनसभेला माहिती दिली. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीशा, पश्चिम बंगाल या राज्यांशी हा मार्ग जोडला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात बायपास जाणार की, शहरातून जाणार याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम होता. सदर मार्ग २४ मीटर म्हणजे, ८० फूटाचा राहणार असल्याचे संदीप यांनी स्पष्ट केले. बायपास मार्गाने आरमोरी शहरासाठी हा मार्ग न्यावा, असे मत काहींनी मांडले तर काहींनी रस्ता बायपास नेल्यास शेतकऱ्यांची शेतजमीन संपादन करावी लागेल. अनेक शेतकरी भूमीहिन होतील. याचाही विचार झाला पाहिजे, असे मत मांडले. तर काहींनी शेतकऱ्यांना बाजारभावानुसार जमिनीचा मोबदला व त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) दुर्वेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार मनोहर वलथरे, नायब तहसीलदार शशीकांत चन्नावार, सहायक अभियंता लभाने, माजी आमदार आनंदराव गेडाम, भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, किशोर वनमाळी, चंदू वडपल्लीवार, अमोल मारकवार, भारत बावणथडे, दिवाकर रामटेके, अमिन लालानी, शरद भोयर आदी उपस्थित होते. त्यानंतर देसाईगंज येथे नगर पालिकेच्या सांस्कृतिक भवनात जनमत सभा झाली. या सभेला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी मात्र पाठ फिरविली. राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी हा देसाईगंज शहरातून न नेता तो बायपास मार्ग न्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातून २४ मीटर रूंदीचा मार्ग राहणार असल्याचे अभियंता संदीप यांनी सांगितले. यावेळी देसाईगंजचे तहसीलदार अजय चरडे यांच्यासह ३०० वर व्यावसायिक उपस्थित होते. (वार्ताहर/प्रतिनिधी)२४ मीटर लांबीच्या (८० फूट) रस्त्यासाठी ६ हजार २२१ झाडे तोडली जाणार४साकोली ते गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग २५३ सी करिता २०.१५ हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. या मार्गावर १२ मोठ्या पुलांचे रूंदीकरण, ९१ लहान पुलांचे नवीन बांधकाम, एका रेल्वे पुलाचे नवीन बांधकाम, २७६ मोऱ्या बांधकाम, दोन ट्रॅक्सकरिता थांबे करावे लागणार आहे. या महामार्गाच्या डाव्या आणि उजव्या बाजुला येणाऱ्या १३ प्रार्थना स्थळांनाही हटवावे लागणार आहे. दोन शाळा, आठ शासकीय इमारती, ४५ निवासी व व्यापारी इमारती व १६५ व्यापारी इमारती व १०४ निवासी इमारती असे एकूण ३३७ मालमत्तेचे संपादन करावे लागणार आहे. यातील १३१ डाव्या बाजुचे तर २०६ उजव्या बाजुचे असतील. १६० किमी एकूण लांबी गडचिरोली-साकोली या राष्ट्रीय महामार्गाची असेल. रूंदीकरिता २४ मीटर जागा अधिग्रहण करणे प्रस्तावित आहे. साकोली-गडचिरोली या मार्गाकरिता ३९.७०० हेक्टर वनजमीन लागणार आहे. ६ हजार २२१ झाडे दोन्ही बाजुने तोडावे लागणार आहे. या अंतर्गत सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबाना नवीन जमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार मदत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरीतपट्टा महामार्ग निर्माण केला जाईल, अशी माहिती अभियंता संदीप यांनी दोन्ही ठिकाणी सुनावणीदरम्यान दिली.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची मागणी
By admin | Updated: January 19, 2016 01:27 IST