तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
बालकांमध्ये वाढतेय चायनीजचे आकर्षण
चामाेर्शी : शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी चायनीजचे हातठेले सुरू करण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक, चायनीज पदार्थ खात असल्याचे दिसून येते. यामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणामही होत आहे.
व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर राबवा
अहेरी : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. मात्र नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायाकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन शिबिर राबविण्यात येतात. मात्र ग्रामीण भागात होत नाही.
ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवा
आरमाेरी : आजच्या युग हे डिजिटल युग आहे. सर्वच क्षेत्रात संगणकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षणसंदर्भात कोणत्याही प्रशिक्षण संस्था नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
धूर फवारणी करण्याची मागणी
गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणावे
चामाेर्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. असे असले तरी, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
स्कूल बसेसची तपासणी करावी
अहेरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्कूल बस असून, या बसद्वारे विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण केली जाते. कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्यामुळे बसही बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी करावी, अशी मागणी आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला
आष्टी : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याकडेला ही कुत्री कळपाने असतात. अनेकवेळा रात्री दुचाकींच्या मागे ती धावतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरू
धानोरा : तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
आष्टी : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या
आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने हे साहित्य धूळ खात पडून आहे. काही शाळांनी वर्गणी गोळा करून वीज जोडणी घेतली; मात्र वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या शाळासुद्धा विजेविनाच आहेत.